TOD Marathi

टिओडी मराठी, टोकियो, दि. 5 ऑगस्ट 2021 – भारतीय पुरुष हॉकी संघाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक मिळवून इतिहास रचला आहे. सुमारे 41 वर्षांनी भारताने हॉकीमध्ये पदक मिळवलं आहे. भारताने बलाढ्य अशा जर्मनी संघाचा 5-4 फरकाने पराभव केला आहे. याबद्दल भारतीय संघाचा कर्णधार मनप्रीत सिंगने हा विजय करोना योद्धे आणि पहिल्या फळीतील कर्मचाऱ्यांसाठी समर्पित करत आहे, असे म्हटलं आहे.

भारताने जर्मनी संघाचा ५-४ ने पराभव करत ४१ वर्षांनी पुन्हा कांस्यपदक मिळविले. सुरुवातीला आघाडी घेतलेल्या जर्मनीला भारतीय संघाने पुनरागमन करत पराभवाची धूळ चारली.

तर यलो कार्डमुळे मैदानात एक खेळाडू कमी असल्याने जर्मनीने मोठा निर्णय घेतला होता. भारतीय संघाची खेळी पाहून जर्मनी गोलकीपरशिवाय खेळली.

भारताकडे ५-४ अशी आघाडी असताना काही करून बरोबरी करण्याच्या उद्देशाने जर्मनीनं आपलं आक्रमण वाढवण्याचा निर्णय घेतला. भारताची बचावफळी भेदता येत नसल्याचे आणि अनेक पेनल्टी कॉर्नरवर गोल करता येत नाही, हे बघून जर्मनीनं गोलकीपरशिवाय खेळून एक आक्रमक खेळाडू खेळवण्याचा निर्णय सामना संपायला काही मिनिटं असताना घेतला.

त्यांचा हा निर्णय अचूक ठरण्याची शक्यताही निर्माण झाली. परंतु शेवटच्या सहा सेकंदांत भारताच्या गोलकीपरने आणि बचावफळीनं अप्रतिम बचाव केला आणि जर्मनीचे मनसुबे धुळीला मिळवले.

सामना अगदी शेवटच्या मिनिटात पोहचला तेव्हा जर्मनी भारताकडे असलेली एक गोलची आघाडी मोडून काढण्यासाठी प्रयत्न करत होता. गोलकीपरशिवाय खेळणाऱ्या जर्मनीला सामन्यातील आपलं आव्हान टिकवून ठेवण्यासाठी आणि अतिरिक्त वेळ किंवा पेनल्टी शूट आऊटपर्यंत सामना नेण्यासाठी सामनाबरोबरीत सोडवणं गरजेचं होतं.

याच प्रयत्नात असताना अगदी सामन्यातील शेवटचे सहा सेकंद शिल्लक होते, तेव्हा जर्मनीच्या संघाला पेनल्टी कॉर्नर मिळाला.

ही जर्मनीची शेवटची संधी होती. कारण, हा गोल झाल्यास सामना बरोबरीत सुटणार होता तर दुसरीकडे भारताने हा गोल वाचवल्यास ४१ वर्षांनी रौप्य पदकावर नाव कोरणार होता.

पंचांनी शिट्टी वाजवताच जर्मनीच्या संघाने गोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारतीय गोलपोस्टजवळ गोलपकीपरने म्हणजेच श्रीजेशने हा प्रयत्न हाणून पाडला.